बेळगाव – 1 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात आला असून यानिमित्त हजारो सीमा भागातील नागरिक एकत्र आले आहेत. कारवार, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी बेळगाव सीमा परिसर दणाणून निघाला आहे. हातात भगवे ध्वज आणि काळा पेहराव परिधान करून हजारो सीमाभागातील नागरिक बेळगावमध्ये निषेध व्यक्त करत आहेत. यामध्ये महिला, लहान मुलं आणि आबालवृद्धांचा खूप मोठा सहभाग आहे. या काळ्या दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर पोस्टरदेखील लावण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी स्वतंत्र भारतात भाषावार प्रांतरचना झाली, त्याच दिवशी बेळगावसहित ४० लाख मराठी माणसं कर्नाटक राज्यात विभागली गेली. बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेक हुतात्मे झाले. परंतु,अद्याप हा प्रश्न प्रलंबित आहे. या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात आला असून यानिमित्त सीमा भागातील हजारो नागरिक एकत्र आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.