नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांना करोनाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजस्थानचे खासदार दुष्यंत सिंग यांच्या संपर्कात आल्यानंतर दस्तुरखुद्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वत:ला सर्वांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचे सर्वपक्षीय खासदार राष्ट्रपतींच्या संपर्कात आले होते, हे विशेष.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या “ब्रेकफास्ट मिटिंग’मध्ये सामील झालेल्या महाराष्ट्रातील खासदारांना करोनाची लागण झाली की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रपतींनी 19 मार्च रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमधील दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय खासदारांना चहा-पानासाठी बोलाविले होते. यापूर्वी, 18 मार्च रोजीच्या राजस्थानातील खासदारांसाठी चहा-पानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंग सहभागी झाले होते. दुष्यत सिंग करोनाची लागण झालेली गायिका कनिका कपूर हिच्या संपर्कात आले होते. या कारणामुळे दस्तुरखुद्य राष्ट्रपतींनी स्वत:ला अलिप्त करून घेतले आहे. शिवाय, करोनाची चाचणी करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील खासदारांना करोनाची लागण तर झालेली नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, करोना हा एक संसर्गजन्य आजार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 19 मार्च रोजीच्या चहा-पान कार्यक्रमाला महाराष्ट्रातील बहुतांश खासदार उपस्थित होते. यात केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर आणि रामदास आठवले यांचा समावेश होता. याशिवाय, माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे संजय राउत, कुमार केतकर, विनय सहस्रबुध्दे, गिरीश बापट, मनोज कोटक, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सुजय विखे-पाटील, डॉ. प्रितम मुंडे, रक्षा खडसे, डॉ. हिना गावित, डॉ. भारती पवार, पुनम महाजन, संजय धोत्रे, विकास महात्मे, गोपाळ शेट्टी, कपिल पाटील, विनायक राउत, अरविंद सावंत, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, कृपाल तुमाने, वेणुगोपाल धूत, राहुल शेवाळे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, वंदना चव्हाण आणि कॉंग्रेसचे कुमार केतकर उपस्थित होते.