मुंबई – करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 31 मे पर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. मात्र सध्या राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने 1 जूनपासून रेडझोनमधील 14 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत लाॅकडाऊन शिथील होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत हे संकेत दिले आहेत. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवडाभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी 15 दिवस बंदच
तसेच मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
रेड झोनमधील जिल्हे
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.