मुंबई – राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे..”ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असेही राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.
नव्या नियमावलीनुसार 15 मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ करोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल.
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे, नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकेच नव्हे, तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचे पालन झाले नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.