सर्वाधिक निधी मुंबई आणि पुणे जिल्ह्यातून
पुणे – देशातील आजी-माजी सैनिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सैनिक कल्याण विभागातर्फे निधी संकलित केला जातो. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, गेल्या वर्षी राज्यातून तब्बल 35 कोटी रुपये इतका निधी संकलित करण्यात आला आहे. यापैकी सर्वाधिक निधी हा मुंबई आणि पुणे जिल्ह्यातून संकलित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात आली.
देशसेवेत आयुष्य व्यतित करणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगले भविष्य, विविध सुविधा मिळाव्यात यासाठी सैनिक कल्याण विभागातर्फे विविध प्रयत्न केले जाते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे निधी संकलन. लष्कराच्या “फ्लॅग डे’ उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील नागरिकांकडून लष्करासाठी कल्याण निधी संकलित केला जातो. विभागातर्फे 2018-2019 या वर्षात राज्यातून सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. यामध्ये मुंबईतून सर्वाधिक म्हणजे सुमारे तीन कोटी, तर पुण्यातून 2 कोटी, 50 लाख रूपये इतका निधी संकलित करण्यात आल्याचे कर्नल विनायक तांबेकर (नि.) यांनी सांगितले.
कर्नल तांबेकर म्हणाले, “आजी-माजी सैनिकांसाठी सैनिक कल्याण विभागातर्फे विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. यामध्ये सैनिकांना आरोग्य उपचार, चरितार्थ, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत केली जाते. तर, अपंग सैनिकांनाही विविध प्रकारची मदत उपलब्ध केली जाते. याव्यतिरिक्त सैनिकांच्या मुलांसाठी राज्यात 52, तर पुण्यात 2 वसतिगृहे आहेत. यामध्ये 2,700 मुले-मुली राहत आहेत. अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहय्याची गरज असते. समाजातील इतर क्षेत्रांतून ही मदत मिळवण्यासाठीच
“फ्लॅग डे’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतर्गत निधी संकलनात महाराष्ट्र अग्रेसर असून, त्यापाठोपाठ पंजाब आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे.’