कोल्हापूर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्नावर येत्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा, या मागणीसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. 2004 पासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दीड वर्षांपूर्वी या प्रकरणाची अखेरची सुनावणी झाली होती. त्यामुळे 17 मार्चला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दावा दाखल करून कर्नाटकात असलेल्या 865 खेड्यांवर आपला हक्क मागितला आहे. त्याला कर्नाटक विरोध करत आहे .विशेषता कर्नाटकाने हा दावा अस्तित्वात येतच नाही ,सीमाप्रश्न संपलेला आहे तेव्हा महाराष्ट्राने केलेली मागणी चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले असल्यामुळे सुनावणी लांबत आहे. मूळ दाव्याला सुरुवात होण्यापूर्वी कर्नाटकाच्या पोट दाव्यावर सुनावणी कधी होणार हा प्रश्न असून येत्या 17 मार्चला होणाऱ्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .