मुंबई – काश्मिरातील हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या जीवाचे रक्षण करण्यात केंद्र अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संबंधात राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, यांनी म्हटले आहे की, काश्मीरातील हत्या प्रकरणाचे भाजपकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल गेले जायचे. हेच लोक काश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटाच्या प्रचारात व्यस्त होते.
विस्थापित काश्मिरी पंडितांना सुरक्षित आश्रय देऊ करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, तर भाजपने केवळ त्यांच्या भावनांशी खेळ केला, त्यांच्या स्थितीचे भांडवल करून राजकीय लाभ उठवला असा दावा तपासे यांनी केला. देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे हे गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांचे कर्तव्य आहे. पण त्यात ते अपयशी ठरले आहेत.
काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा बंडखोरी वाढणे आणि तेथील नागरिकांना लक्ष्य करणे हे गुप्तचर यंत्रणेचेही अपयश असल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेवर आल्यास काश्मीरी पंडितींचे काश्मीर खोऱ्यात आम्ही पुनर्वसन करू असे आश्वासन पंतप्रधान मोदींच्या सरकारने दिले होते. पण त्यांचे हे आश्वासनही जुमलाच ठरल्याचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने नमूद केले. पंडितांच्या पुनर्वसनासाठी मोदी सरकारने कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहींत असेही त्यांनी म्हटले आहे.