जालना – राज्यातील नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध हटवण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात टास्क फोर्सची बैठक पार पडली. जिथे रुग्णसंख्या खुप कमी आहे अशा 25 जिल्ह्यांतील निर्बंध हटवण्याची माहिती आहे. याबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात निर्बंध हटवण्यासंदर्भात संपूर्ण गृहपाठ झाला असून टास्क फोर्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते आली आहेत. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
करोनाच्या कठोर निर्बंधांमुळं अडचणीत सापडलेल्या नागरिकांना लवकरच राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील करोना कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सबरोबर केलेल्या चर्चेनंतर आज निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश काढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार राज्यात दररोज सात हजाराजवळ निवीन रुग्ण आढळते आहेत. एप्रिल महिन्यात हा आकडा 67 हजाराजवळ होता. करोनासंसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला असून मोठ्या प्रमाणात लसीकरणही झाले आहे. त्यामुळे निर्बंध हटवण्यासंदर्भात लवकरच निर्णय होऊ शकतो.