मुंबई – वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आता दहावीची परीक्षा जून महिन्यात होणआर असून बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
राज्यात करोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत ऑफलाइन परीक्षा घेणे धोक्याचे आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेसाठी ग्रामीण भागात इंटरनेटची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलाव्या का? यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओद्वारे दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 10वी आणि 12वी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा कशी घ्यायची हा सर्वांसमोरच चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्मय स्वीकारावा, अशी विनंती मी करत आहे.”
दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार होती. दहावीच्या परीक्षेसाठी साधारण 17 लाख, तर बारावीच्या परीक्षेला 15 लाख विद्यार्थी असतात.