फडणवीस आणि अजितदादांनी जनतेची माफी मागावी
नवी दिल्ली : फाटाफुटीतून जन्मलेले महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली.
फडणवीस आणि अजितदादांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी फडणवीस, अजितदादा यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.
महाराष्ट्रातील घडामोडींमुळे जनादेशाचे अपहरण करणाऱ्यांकडे संख्याबळ नसल्याचे उघड झाले. भाजपची चाणक्यनीती म्हणजे लोकशाहीचे अपहरण असल्याचेही स्पष्ट झाले. अल्पमतातील सरकार स्थापून बहुमत असल्याचा ड्रामा का करण्यात आला? भ्रष्टाचाराची प्रकरणे मागे का घेण्यात आली, असे अनेक सवाल सुर्जेवाला यांनी विचारले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. अवैधरित्या सत्ता बळकावण्यासाठी भाजपने राज्यघटनेचे आणि उच्च पदांचे नुकसान केले. ते भरून निघण्यास मोठा काळ लागेल, असे त्यांनी म्हटले.