मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी देखील देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकारकडून वसुली रॅकेट सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची काय जबाबदारी आहे. यावर ते अद्याप काहीही बोलले का नाही. या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसून लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे भाटिया यांनी नमूद केलं.
महाराष्ट्र सरकार देशाच्या लोकशाहीसाठी धोका आहे. कोविड व्हायरसपेक्षा अधिक घातक महाराष्ट्रातील सरकार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. चौकशीसाठी केंद्रीय संस्था किंवा न्यायालयीन चौकशी होऊ शकते, असंही भाजपने म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात उत्तर द्यावं तर अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.