गणेश घाडगे/नेवासा: जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षे एकत्र असलेली घुले-गडाखांची युती मागील विधानसभा निवडणुकीत दुभंगली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ज्या कुकाणे येथील मेळाव्यात ही युती दुभंगली तेथेच पुन्हा मनोमिलन झाले. नेत्यांनी जरी आपल्या सोयीनुसार आपली भूमिका घेतली असली, तरी त्याचा त्रास माक्ष कार्यकत्यांना होत आहे. मागील चार वर्षांत घुले-गडाख राजकीय संर्घषामुळे अनेक कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द संपली, तर अनेकांनी आपल्या नेत्यासाठी थेट घुले-गडाखांशी राजकीय वैर घेतले. त्यामुळे हे मनोमिलन नेत्यांचे की कार्यकत्यांचे होणार, हे होणाऱ्या विधानसभा निवडणूक निकाल नंतरच कळेल.
नेवासा तालुक्याचे राजकारण हे बेभरवाशाचे आहे, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. प्रत्येक वेळी वेगळाइतिहास घडवणारा तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. चाळीस वर्षे तालुक्यावर घुले-गडाखांची एकहाती सत्ता होती. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्तेही एकच, तरीही प्रस्थापितांच्या विरोधात लाट निर्माणकरत माजी आमदार तुकाराम गडाख, आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी घुले-गडाखांना धोबिपछाड देत विजय मिळवला. नेमके येथेच घुले बंधूंनी आमदार मुरकुटेंना मदत करुन विश्वासघात केल्याची भावना गडाखांची झाली. तेथूनच घुले-गडाखांचा राजकीय संर्घष सुरू झाला.
सुप्त असणारा हा संर्घष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उफाळून येत शंकराव गडाखांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वतंत्र क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली. तसेच आ. मुरकुटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात दणदणीत विजय मिळवून तालुक्यात गडाखांचे वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे घुलेंची राष्ट्रवादी नावापुरतीच शिल्लक असल्याची भावना तालुक्यात तयार झाली.
या निवडणुकीत शंकरराव गडाखांनी ज्ञानेश्वर कारखान्यातील अनियमितता व उसाचा कमी दिलेला भाव, हे मुद्दे उपस्थित करत सभा गजविल्या, तर घुले बंधूंनी गडाखांना उत्तरे देत समाचार घेतत्याने पहिल्यांदा घुले-गडाखांनी एकमेकांवर आरोपाची राळ टाकली. त्यामुळे एकत्र असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी दरी निमार्ण झाली. सोशल मीडियातून एकमेकांचे कार्यकर्ते घुले-गडाखांवरती आरोप करु लागले.
स्थानिक पातळीवरही घुले-गडाख कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडू लागले. एकमेकांच्या कार्यक्रमात कार्यकर्ता दिसला तरी नेत्यांचे फोन कार्यकत्यांना सुरु झाले. या काळात अनेक कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द संपली. अनेकांनी तर या नेत्यांसाठी घुले-गडाखांशी थेट राजकीय वैर घेतले. नेत्याबरोबरच कार्यकर्त्यांचा संघर्ष विकोपाला गेला. मागील चार वर्षे घुले-गडाखांच्या कार्यकर्त्यांची संर्षाची स्थिती राहिली असताना विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या कुकाण्यातून संघर्षपेटला, त्याच कुकाण्यात घुले-गडाखांचा मनोमिलनाचा मेळावा पार पडला आहे.
तालुक्यातील या नेत्यांच्या बदललेल्या भूमिकांमुळे काहींनी अपरिहार्यता म्हणून नेत्यांच्या भूमिकांशी सहमती दर्शवली आहे, तर काहींवर आपण सतत विरोध करत असलेल्या नेत्याच्या बाजूने बोलण्याची वेळ आली. नेते त्यांच्या सोईनुसार भूमिका बदलतात. आपले मात्र प्रत्येक वेळी मरण होते, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहून विरोधकांना धोबिपछाड देण्याचे काम करणे, अशी वेगळी भूमिका घ्यावी लागत असल्याने कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याची भावना व्यक्त होत असल्याने नेमके आजचे हे घुले-गडाख मनोमिलन खरचे झाले का, हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.