मुंबई – राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांनी अलिकडेच कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मागच्या पुराच्या काळात सरकारला जे अहवाल सादर करण्यात आले आहेत, त्या अहवालांतील सुचनांची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन उभारण्याची मागणीही फडणवीसांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात त्यांनी राज्य सरकारकडे तब्बल 26 मागण्या केल्या आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाच्या साफसफाईचे काम वेगाने हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.