मुंबई :– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २३० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (एप्रिल १८, २०२०) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्हाट्सॲप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा फॉरवर्ड मेसेजेसवर अंध विश्वास ठेवू नका. सर्व व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप निर्माते (owners) यांच्यावर विशेष जबाबदारी आहे की, या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाऊनच्या काळात आपल्या व्हाट्सॲप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. ग्रुप सेटींग काही काळाकरिता केवळ ॲडमिन ‘only admins’ करा. एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) द्या.
कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.