मुंबई – महाराष्ट्रत नातलगांना लाभ मिळून दिल्यामुळे याआदी दोन मुख्यमंत्र्यांना सीएम पदाची खुर्ची सोडावी लागली आहे. शिवसेना-भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या जावायामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यात सासूच्या नावावर असलेल्या फ्लॅटमुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेहुण्यामुळे अडचणीत आले आहेत.
मनोहर जोशी 1998 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते पण जावई गिरीश व्यास यांच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. जोशी यांचे जावई गिरीष व्यास यांच्या पुण्यातील जमीन व बांधकामावरून वाद निर्माण झाला होता. मोक्याच्या भूखंडावरील शाळेचे आरक्षण उठवून ते दुसरीकडे स्थलांतरित करून व्यास यांनी इमारतीचे बांधकाम केल्याने ते वादात अडकले. जावयासाठी जोशी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्या वेळी झाला होता.
दुसरे प्रकरण अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आहे, चव्हाण यांचे नाव आदर्श सोसायटी घोटळ्यात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीत सासूबाईंचा फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. त्यामुळे त्यांना 2010मध्ये मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं.
दरम्यान, मनी लॉन्डिरग प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त केल्या आहेत. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते पुष्पक ग्रुपचे भागीदार आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची अंदाजे किंमत 6.45 कोटी रुपये आहे. या कारवाईनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.