मुंबई- अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज जाहीर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून “पंचामृत’ ध्येयावर आधारित अर्थसंकल्प असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प 13,437 कोटी रुपयांचा आहे. आजच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
ज्यात शाश्वत शेती, शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योजक, आदिवासी, मागासवर्ग आदी समाजातील सर्वच घटकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने फडणवीस आपल्या पेटाऱ्यातून काय देणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
नागपूरला झुकते माप
अर्थसंकल्पात फडणवीसांनी नागपूरला झुकते माप देत भरघोस निधी दिला आहे. नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 228 कोटींची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वरसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (43.80 कि. मी) 6708 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी फडणवीसांनी निधी दिला आहे, तर नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. तेथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब करण्यात येणार आहे. याशिवाय, नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी तर, श्री संत जगनाडे महाराज आर्टगॅलरी नागपूरसाठी 6 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.