मुंबई : देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने करोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले आहे.
गुरुवारी राज्यात २८६ करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढलळल्याने संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९४ झाली आहे. मृतांमधील चार जण मुंबई आणि तिघे पुण्यातील होते. यामधील चार रुग्णाचं वय ६० च्या पुढे होते, तर इतर जण ४० च्या पुढचे होते. यामधील सहा जणांना अस्थमा, उच्च रक्तदाब, डायबेटिस सारखे त्रास होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.