पुणे – सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेला तब्बल 264 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षाच्या या तिमाहीच्या तुलनेत या नफ्यामध्ये तब्बल 103 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी यांनी सांगितले.
बॅंकेचा दुसऱ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर करताना राजीव म्हणाले की, या तिमाहीमध्ये व्याजातील उत्पन्नात भरघोस वाढ झाल्यामुळे बॅंकेला नफा वाढला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला केवळ 130 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. बॅंकेने सर्व आघाड्यावर या तिमाहीत उत्तम कामगिरी केली असल्यामुळे बॅंकेचा नफा वाढला असल्याचे ते म्हणाले.
अनुत्पादक मालमत्तेमधील 340 कोटी रुपयाच्या कर्जाची वसुली झाली आहे. त्यामध्ये डीएचएफएलकडून मिळालेल्या 258 कोटी रुपयाचा समावेश आहे. त्यामुळेही बॅंकेचा ताळेबंद सुधारण्यास मदत झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये बॅंकेचा नफा 104 टक्क्यांनी वाढून 472 कोटी रुपये झाला आहे.
गेल्या वर्षी या सहा महिन्यात बॅंकेला 331 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 5.56 टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता 8.81 टक्के इतकी होती. या कालावधीत बॅंकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 3.30 टक्क्यावरून 1.73 टक्के इतकी कमी झाली आहे.
या कालावधीत बॅंकेकडील ठेवी 14.47 टक्क्यांनी वाढून 1,81,572 कोटी रुपये इतक्या झाल्या आहेत. याचबरोबर या कालावधीत बॅंकेने केलेला कर्जपुरवठा 11.44 टक्क्यांनी वाढून 1,15,235 कोटी रुपये इतका झाला आहे. या वर्षीत बॅंकेचा कर्जपुरवठा 14 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राजीव यांनी व्यक्त केली. बॅंकेने जाहीर केलेल्या या ताळेबंदानंतर बॅंकेचा शेअर साडेचार टक्क्यांपर्यंत वाढला होता.