नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा एकूण व्यवसाय अगोदरच वाढला आहे. आता आर्थिक परिस्थिती सुधारण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे लवकरच बॅंकेचा एकूण व्यवसाय तीन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी सांगितले की, ठेवी, कर्ज पुरवठा, कर्ज वसुली, जोखीम व्यवस्थापन या क्षेत्रात बॅंक अगोदरच यशस्वीपणे काम करीत आहे. करोना व्हायरसच्या काळात परिस्थिती खराब असूनही बॅंकेचा ताळेबंद विस्तारला असून बॅंकेने अनुत्पादक मालमत्ता कर्जवसुली करून कमी केली आहे.
आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे आगामी काळात बॅंकेच्या कार्याचा विस्तार होणार असल्याचे ते म्हणाले. जून 2021 अखेरीस बॅंकेचा एकूण व्यवसाय (ठेवी आणि कर्ज) 14.17 टक्क्यांनी वाढून 2.85 लाख कोटी रुपये इतका झाला आहे.
कमी व्याजदरावरील ठेवीचे प्रमाण वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॅंकेने सरकारी व्यवहार हाताळण्यासाठी एक वेगळी शाखा निर्माण केली असल्याचे राजीव म्हणाले. या नवीन शाखेचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी केले. या शाखेतून सरकारी विभागाची आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची खाती हाताळली जातील.
या शाखेच्या उद्घाटनावेळी बॅंकेच्या महाव्यवस्थापक चित्रा दातार आणि उपमहाव्यवस्थापक नयना सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. सरकारी खात्यातून आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खात्यातून बॅंकेला कमी व्याज दरावरील ठेवी मिळतील. त्यामुळे बॅंकेला कमी व्याजदरावर कर्ज वितरण करण्याची शक्यता खुली होईल. घर आणि वाहनास किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकासाठी बॅंकेने विशेष योजना जाहीर केल्या आहेत. कर्जाचा पुरवठा वाढावा याकरिता बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी अगोदरच मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.