मुंबई : सुधारीत नागरीकत्व कायद्याला (का) विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या बंदला मुंबई आणि सोलापुरात हिंसक वळण लागले.
सोलापुरात महापलिका परिवहनच्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र बसच्या काचा फुटल्या. मुंबईतील चेंबूर भागात बेस्टच्या बसवर दगडफेक करण्यात आली. या बंदला हिंसक वळण देऊ नये, असे आवाहन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
काच्या विरोधात जनतेत रोष आहे. मात्र तरीही केंद्र सरकार तो जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. देश आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. केंद्र सरकारची आर्थिक धोरणे चुकीची आहेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.