Maharashtra Assembly Election 2024 – मागील 4 आठवड्यांपासून राज्यभर सुरू असणारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी 6 वाजता खाली बसला. आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत प्रयत्न सुरू होणार आहे. यात मतदारांना पैसे व भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे.
पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, आता प्रचारसभा, रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली आदींचा दणदणाट शांत झाला असून, अवघ्या महाराष्ट्राला बुधवारी होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.
निवडणूक आयोगाने गत महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर राज्यात प्रचाराचा धडाका सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीसाठी आपला पूर्ण जोर खर्ची केला.
तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आपल्यामागे उभे टाकण्याचे आवाहन केले.
बुधवारी ठरणार 288 मतदारसंघांचे भवितव्य
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात राज्यातील 4 कोटी 95 लाख पुरुष व 4 कोटी 64 लाख महिला मतदारांसह एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. हे मतदार 4136 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रात बंद करतील.
द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) माहितीनुसार, राज्यातील 4136 उमेदवारांपैकी 490 उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे, 496 उमेदवार प्रादेशिक पक्षांचे, 1036 उमेदवार मान्यता नसलेल्या पक्षांचे, तर 2087 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
मविआचा मराठी अस्मितेला हात
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीद्वारे आपलाच गट खरा राष्ट्रवादी व शिवसेना आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे. त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला.
भाजपने आपल्याला कसा धोका दिला? व एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी कशी गद्दारी केली? हे उद्धव ठाकरे यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी भाजपवर प्रहार करत भाजपपासून महाराष्ट्राचा बचाव करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत मराठी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला.
महायुतीचा संपूर्ण जोर हिंदुत्वावर
भाजप व महायुतीचा संपूर्ण प्रचार हिंदुत्वाच्या मुद्याभोवती फिरता राहिला. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने विकासाच्या जोरावर मते मागितली. पण त्यानंतर हा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ हैच्या दिशेने पुढे सरकला. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीने या मुद्यावरून विरोधकांवर निशाणा चढवत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकी संबंधित आकडेवारी :
- एकूण जागा- 288
- एकूण उमेदवार- 4136
- पुरुष मतदार- 4 कोटी 95 लाख
- महिला मतदार- 4 कोटी 64 लाख
- एकूण मतदार- 9 कोटी 59 लाख