नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशामध्ये भारतातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. सर्वात आधी कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यातून सुरु झाला असला तरी सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचा विळखा सर्वात जास्त आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह उत्तर भारतातील सहा प्रभावित राज्यांत जेवढे कोरोनाचे रुग्ण आहेत ते एकट्या महाराष्ट्रात आहेत.
देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३६९ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ०६८ रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये ३ हजार ३०१ रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण १९ मार्च रोजी समोर आले होते. तर केरळमध्ये देशातील कोरोनाचे पहिले प्रकरण ३० जानेवारीला समोर आले होते. त्यानंतर, लॉकडाऊनच्या ४० दिवसांत कोरोनाची प्रकरणं ९९ टक्क्यांनी वाढली.
दरम्यान, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि हरियाणा ही सर्वाधिक सहा प्रभावित राज्य आहेत. ३०० कोटी लोकसंख्या असलेल्या राजस्थान, दिल्ली या तीन राज्यांमध्ये दोन हजारांहून अधिक रुग्ण असून उत्तर प्रदेशमध्ये तेवढेच रुग्ण आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबमध्ये असे कोणतेही शहर नाही जिथे ३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं आहेत.