चंदिगड: झीम काझी, राहुल त्रिपाठी यांची आक्रमक पलंदाजी आणि दिग्विजय देशमुख व सत्यजीत बच्छाव यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पंजाबचा 45 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना केदार जाधवला पुन्हा एकदा सरस कामगिरी करण्यात अपयश आले. अझीम काझीने 36 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. त्याला योग्य साथ देताना त्रिपाठीने 4 चौकार व 5 षटकार फटकावत 63 धावांची खेळी केली.
पंजाबकडून सिद्धार्थ कौलने 2 गडी बाद केले. विजयासाठी 202 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या मनदिपसिंगने अर्धशतकी कामगिरी केली. अनमोलप्रीत सिंगनेही डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा डाव महाराष्ट्राच्या संमिश्र गोलंदाजीसमोर 7 बाद 156 धावांवर रोखला गेला.
महाराष्ट्राच्या दिग्विजय देशमुखने 34 धावांत 3 गडी बाद केले. सत्यजीत बच्छावने 22 धावांत 2 गडी बाद केले. यांच्या कामगिरीच्या जोरावर मिळविलेल्या विजयाने महाराष्ट्राने सुपर फेरीच्या आशा कायम राखल्या.