अलिबाग, दि. 14 – भारतीय हवामान खात्याने चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा दिल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या विविध भागात खोल समुद्रात गेलेल्या 142 बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहचल्या आहेत. हे चक्रीवादळ 16 मे पर्यंत कोकण ते मुंबई पर्यंतच्या किनाऱ्यावर थडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
या चक्रीवादळामुळे कोकण, गोवा आणि मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रातही मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून हा इशारा मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मत्स्य विभागाने या बोटींना मागे फिरण्याचे संदेश दिले होते.
त्यानुसार अलिबाग, मुरूड आणि उरण तालुक्यातील मच्छिमारांनी आपल्या बोटी मागे बोलावल्या. येत्या रविवारी व सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोराच्या ते अतिजोराच्या पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे.