आसामवर २१८ धावांनी मात; जय पांडे सामनावीर
गुवाहटी : आशय पालकर आणि मुकेश चौधरीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी चषक स्पर्धेत आसामवर २१८ धावांनी शानदार विजय मिळवला. यासह महाराष्ट्राने ६ गुण खात्यात जमा केले आहेत. महाराष्ट्र गुणतालिकेत एकूण १५ गुणांसह सातव्या स्थानावर पोहचला आहे.
Maharashtra Won by 218 Run(s) #ASMvMAH @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/IQ1n8377Ru
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 22, 2020
महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद १७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आसामने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावांपर्यत मजल मारत ६९ धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर महाराष्ट्राने जय पांडेच्या १३० धावांच्या जोरावर दुसरा डाव ९ बाद ३६५ वर घोषित करत आसामसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवलं होते.
विजयासाठी २९७ धावांचा पाठलाग करताना आसामचा दुसरा डाव २३.५ षटकांत अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून दुस-या डावात गोलंदाजीत आशय पालकरने १३.५ षटकांत ४२ धावा देत ६ तर मुकेश चौधरीने १५ षटकांत ३० धावा देत ३ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
A Palkar 6 WICKETS! (13.5-4-42-6), Assam 78/10 #ASMvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 22, 2020
महाराष्ट्राचा फलंदाज जय पांडेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. आता महाराष्ट्राची पुढची लढत २७ जानेवारीपासून त्रिपुराविरूध्द होईल.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : सर्वबाद १७५(अंकित बावणे ७५, सत्यजित बच्छाव ४०,अरूप दास ४-६६,रणजित माली ४-५५) आणि दुसरा डाव : महाराष्ट्र : ९ बाद ३६५ वर घोषित : ( जय पांडे १३०, व्ही मोरे ५७, एस बच्छाव ५१, रणजीत माली ५-१२३, अरूप दास २-६९, मुख्तार हुसेन २-९४) विरूध्द आसाम : पहिला डाव : ७८.१ षटकांत सर्वबाद २४४( रूषव दास ९४, शुभम मंडल ३२, रियान पराग २३, सत्यजित बच्छाव ४-४४, मुकेश चौधरी ३-८२, आशय पालकर २-५५) आणि आसाम : दुसरा डाव : २९.५ षटकांत सर्वबाद ७८( साहिल जैन १९, शुंभम मंडल १७, रिषव दास १५, आशय पालकर ६-४२, मुकेश चौधरी ३-३०).