पुढच्या महिन्यात सरळ सेवा पदभरती त्रयस्थ यंत्रणेद्वारे
पुणे – राज्य सरकारने उमेदवारांच्या तक्रारीवरून महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाच महिन्यांपूर्वी घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारच्या “महाआयटी’ विभागाकडून नव्याने त्रयस्थ यंत्रणेद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात सरळ सेवा भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पदे, आरोग्य सेवक, शिपाई, कारकून, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस, तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे होत होती. त्यात भ्रष्टाचार, डमी उमेदवार, गुणांची अफरातफर अशा तक्रारी निदर्शनास आल्या. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. अखेर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्य सरकारच्या “महाआयटी’तर्फे नव्याने सरळ सेवा पदभरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. करोनामुळे निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात होती. वारंवार मुदतवाढीमुळे स्पर्धा परीक्षेचे उमेदवारही हवालदील झाले आहेत. मात्र, महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या चुका सुधारून परीक्षा घेणे व निकाल लावण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारही नव्या कंपनीच्या यंत्रणेकडे सकारात्मक दृष्ट्या पाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दुसरी कंपनी येण्यास विलंब
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी “महाआयटी’चे व्यवस्थापकी संचालक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण कधी होणार आहे, या प्रश्नावर अजित पाटील येत्या 10 ऑगस्टपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले. सरळ सेवेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, पण “महापरीक्षा’ पोर्टलच्या ठिकाणी दुसरी कंपनी येण्यास विलंब होत आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी कल्पेश यादव यांच्याकडून करण्यात आली आहे.