नवी दिल्ली : मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधणारे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी अलीकडेच महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी सरकारला घेरताना दिसले आहे. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, ‘देशातील महागाई, बेरोजगारी याला पंतप्रधान मोदी नाहीत, तर मुघल जबाबदार आहेत.’ एआयएमआयएमच्या ट्विटर हँडलवरून ओवेसींचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
देश में महंगाई, बेरोज़गारी, और बढ़ती पेट्रोल-डीज़ल की कीमतों का ज़िम्मेदार @narendramodi नहीं, मुग़ल हैं😜 – Barrister @asadowaisi https://t.co/KLDrUaOwMz
— AIMIM (@aimim_national) July 4, 2022
या व्हिडिओमध्ये ओवेसी केंद्र सरकारवर टोमणा मारताना दिसून येत आहे, ‘भारतातील तरुण बेरोजगार आहेत, महागाई गगनाला भिडली आहे, डिझेल 100 रुपयांच्या पुढे गेले तर याला पीएम मोदी नाही तर मुघल सम्राट औरंगजेब जबाबदार आहेत. मुलांना नोकरी नाही, याला सम्राट अकबर जबाबदार आहे. पेट्रोल 115 रुपये लिटर झाले आहे, यासाठी ताजमहालचा बिल्डर जबाबदार आहे. ताजमहाल बांधला नसता, तर आज पेट्रोल ४० रुपयांना मिळालं असतं. ताजमहाल आणि लाल किल्ला बांधून त्यांनी चूक केली. हे बनवायचे नव्हते, तो पैसा वाचवायला हवा होता की २०१४ साली मोदीजी येतील त्यावेळी हे पैसे त्यांना दिले असते.’
त्याचवेळी ते म्हणाले,’सर्व गोष्टींना मुस्लिम आणि मुघल जबाबदार आहेत. भारताच्या इतिहासात मुघल राजवट होती का? त्यापूर्वी सरकार नव्हते. सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे सरकार नव्हते का? अनेक सरकारे होती. मात्र भाजपच्या नजरेत फक्त मुघल दिसत आहे. एका डोळ्यात मुघल आणि दुसऱ्या डोळ्यात पाकिस्तान.’ असं म्हणत ओवेसी यांनी मोदी सरकारला टोला लगावला.
एआयएमआयएमचे प्रमुख म्हणाले,’आम्हाला मुघलांकडून काही घ्यायचे नाही आणि पाकिस्तानशी आमचा काही संबंध नाही. पण त्यांना जिना-जिना दिसतात. जिनांचं काय करायचं? आम्ही जिनांचा संदेश नाकारला होता. 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहोत. भारतातील सर्व मुस्लिम साक्ष देतात की त्यांच्या आजोबा आणि पणजोबांनी पाकिस्तानचा संदेश नाकारला. भारताला आपली मातृभूमी मानली जात होती. भारत ही आपली मातृभूमी आहे. आम्ही भारत सोडणार नाही. तुम्ही ‘हे सोडा… सोडा’ अशा लाखो घोषणा देत आहात. सोडणे तर दूरच आहे. आपण जिवंत राहिलो तरी या पृथ्वीवर छातीशी धरून राहू आणि मेलो तरी या भूमीत जाऊ.’असेही ते म्हणाले.