नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीत कायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना ईडी आणि सीबीआयकडून धमकावले जात आहे. जेणेकरून त्यांची दुकाने बंद होतील व बेकायदा विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून पैसा कमावता येतील अशी ही योजना आहे. दरम्यान, आम्ही दिल्ली सरकारच्या नव्या मद्यविषयक धोरणाला स्थगिती दिली आहे. तसेच आता सरकारी दारूची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.
सिसोदिया म्हणाले की भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही नवे मद्यधोरण आणले. यापूर्वी सरकारला 850 मद्यविक्रीच्या दुकानांतून साडेसहा हजार कोटी महसूल मिळत होता. मात्र आमच्या नव्या धोरणामुळे तेवढ्याच दुकानांतून 9 हजार कोटी रुपये मिळाले. गुजरातमध्ये बंदी असूनही खुलेआम दारू विक्री केली जाते. यांचेच (भाजप) लोक दारू तयार करतात आणि विकतात.
विषारी दारू विकली जाते आणि तेथे लोक मरतात. गुजरातमध्ये त्यांनी हे मॉडेल लागू केले आहे. दिल्लीत मात्र आम्ही 2021-22 मध्ये नवे धोरण आणले. पूर्वी दारूविक्रीत मोठा भ्रष्टाचार होता. मित्र परिवारालाच परवाने देण्यात आल्या असल्यामुळे लायसन्स फी वाढवली जात नव्हती. त्यामुळे राज्याचा महसूल वाढत नव्हता. आमच्या धोरणामुळे सरकारचे उत्पन्न दीडपटीने वाढले. त्यामुळे आता हे धोरणच रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. दुकानदारांनी दुकाने बंद करावीत यासाठी त्यांना धमकावले जाते आहे. दिल्लीत आज 468 च दुकाने आहेत.
गुजरातप्रमाणे दिल्लीतही बोगस दारू विकण्याची त्यांची इच्छा आहे. तसे झाले तर दिल्लीतही लोक मृत्यूमुखी पडतील. मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. त्यासाठी आता सरकारी दुकानांतूनच दारू विक्री करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या 1 तारखेपासून दिल्लीत फक्त सरकारी दुकाने असतील.