पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी केले शर्थीचे प्रयत्न; पाच दिवसांत 2,500 नागरिकांची केली सुटका
वाई – माणसाने माणूसपण जपावे, हेच निसर्ग, नियतीचे विधान असावे, म्हणूनच महाबळेश्वरच्या दरी-खोऱ्यात नैसर्गिक आपत्ती, अपघातप्रसंगी धावणारे तरुण नदी खोऱ्यातील पूर प्रलयाच्या आपत्तीप्रसंगी कामी आले. त्यांनी अथक प्रयत्न करत सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केले.
महाबळेश्वर ट्रेकर्स असोसिएशन या संस्थेचे सुनील भाटिया यांच्या नेतृत्वाखाली जयवंत बिरामणे अमित कोळी, मुकुंद झाडे, मंगेश साळेकर, शंकर वागदरे, तेजस जवळ, सचिन डोईफोडे, अनिकेत वागदरे, बाबू वागदरे, यांची टीम. स्वतःचं वाहन, स्वतःबरोबर खाण्यासाठी बिस्कीटे आणि पाणी एवढंच साहित्य घेऊन स्वयंस्फूर्तीने सांगली जिल्ह्यात दाखल झाली.
सांगली, सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कारंदवाडी, कृष्णानगर-हाळभाग, अंकलखोप आदी गावांमध्ये 4 रात्री व 5 दिवस राब राब राबून त्यांनी एनडीआरएफच्या टीम बरोबर सुमारे 2500 लोकांना पूर परिस्थितीतून बाहेर काढले. दरी खोऱ्यातला त्यांचा मदतीचा अनुभव त्यांनी जलमय परिस्थितीत कामी आणला. अनेक माणसे, मुकी जनावरे यांची सुटका केली. या तरुणांकडे पाण्यातील बोट चालविण्याचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते, ना अनुभव. तरीही जिद्द जागी होती. मदत करण्याची भावना होती. आणि 17 ते 58 वयोगटातील ही टीम स्वयंप्रेरणेने बोट चालवत बचाव कार्यात स्वतःला झोकून देत होती. स्वतःच्याच कल्पनेनं, कधी शासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली वृद्ध, लहान मुले, स्त्रिया, रुग्ण यांना प्राधान्य देऊन त्यांची गंभीर पूर परिस्थितीतून सुटका करीत होती. पुराच्या पाण्याने वेढलेले लोक मदतीच्या आणि जिवाच्या आकांताने हाका मारीत होते.
अनेकदा फोनवरून कॉल येत होते. जीव वाचवण्याची आर्त विनंती होती. तर काहीजण स्वतःबरोबरच आपल्या गुराढोरांना वाचवण्यासाठी, घर सोडण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना काम करावं लागत होते. पाणी कमी झाल्यावर, एनडीआरएफच्या जादा टीम दाखल झाल्यानंतर असोसिएशनचे सदस्य पुन्हा महाबळेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली. येताना सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या केबल नेटवर्कचे काम सुस्थितीत होण्यासाठी त्यांनी भारत संचार निगम व अन्य संस्थांना अवघड, जिवावरची कामे करून मदत केली.
रात्री, अपरात्री दीड वाजताही अपघातग्रस्तांना मदत करणारे हे हात आपले आहेत, सातारा जिल्ह्याचे आहेत याचा अभिमान जिल्हा बाळगत आहे, बाळगत राहील. रात्री-अपरात्री जेव्हा फोन येईल, तेव्हा त्या ठिकाणी अनेकदा रस्ता अपघातस्थळी पोहचते. परिसरातील बघ्यांचा, येणाऱ्यांचा स्वार्थ जागा होतो, संवेदना बोथट होतात. आणि अनेकजण अपघातग्रस्तांच्या अंगावरील दागदागिने, त्यांच्याकडील पैसे यांची लुटालूट करतात, हे सर्व टाळण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स असोसिएशन केलेल्या मदत कार्याचे स्वत:च रेकॉर्डिंग करतात आणि विश्वास दृढ करतात.