महाबळेश्वर – जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या कारवाईचे शहरातून कौतुक केले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे. परंतु सहलीसाठी जिल्हाबंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.
मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेलमधील रूम ऑनलाइन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्यावर आले असता त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला. ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने पर्यटकांच्या शोधासाठी पथक रवाना केले.
या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छ. शिवाजी महाराज चौकात पकडली, तर इतर दोन गाड्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकार्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्यांना सर्व हकिकत सांगितली.
मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास 10 हजार, तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनास 25 हजार रुपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने एकूण 55 हजाराचा दंड वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरातून कौतुक केले जात आहे.