महाबळेश्वर – करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अथवा करोनाचे रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महसूल विभागाने गेल्या चाळीस दिवस मेहनत घेवून 105 गावातील 7895 लोकांची वैद्यकिय तपासणी केली. सुदैवाने या तपासणीमध्ये एकही करोनाचा रूग्ण अथवा या रोगाची लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आली नाही. त्यामुळे सध्या तरी महाबळेश्वर तालुका आजअखेर करोनामुक्त असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी दिली.
करोनाचे आक्रमण सुरू झाल्यापासून देशात सर्वत्र खबरदारीचे उपाय सुरू करण्यात आले, सातारा जिल्ह्यातही प्रशासनाकडून ठोस उपायोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाने जिल्हाबंदी करून इतर जिल्ह्यातून येणारांना प्रवेश बंदी करण्यात आली, प्रवेश बंदी डावलून आलेल्या अनेकांना संस्था विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले तर अनेकांना होम क्वारंटाइन करण्यात आले.
याबरोबरच ग्रामीण व शहरी भागातील लोकांची वैद्यकिय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागासाठी 1 वैद्यकिय अधिकारी, 1 नर्स व इतर दोन कर्मचारी अशी दोन पथके तयार करून या पथकांद्वारे तालुक्यातील 105 गावातील प्रत्येक व्यक्तींची घरी जावून वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 685 इतर आजारांचे रूग्ण आढळून आले या सर्वांना त्यांच्या आराजावार मोफत औषधोपचार करण्यात आले. महाबळेश्वर पालिका व पाचगणी पालिकेने देखील घरोघरी जावून नागरीकांची आरोग्य तपासणी केली आहे, ज्यांना किरकोळ ताप आहे, अशा रूग्णांची वरचेवर पुन्हा पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. सुदैवाने दोन्ही शहरात व ग्रामीण भागात करोनाचा रूग्ण अथवा लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आली नाही.
धनिकांच्या बंगल्यातील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 21 मार्च रोजी आदेश काढून मुळ मालकाच्या कुटूंबा व्यतिरीक्त असलेल्या सर्वांना त्यांच्या मुळ गावी जाण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शेकडो लोक आपल्या मुळ गावी गेले होते. परंतु आता पुन्हा अशा बंगल्यांमध्ये लोक येत असल्याचे आढळून येत आहे, अशा सर्वांवर महसूल विभागाचे लक्ष असल्याचेही तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्याबाहेर जावू इच्छिणारे परप्रांतीय कामगारांची नोंदणी सुरू झाली आहे, महाबळेश्वर शहरातून 909 तर पाचगणी पालिकेत साधारण 352 कालपर्यंत 1261 कामगारांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्वांना टप्प्या टप्प्याने येथून सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तालुक्यात बाहेरून आलेल्या लोकांना पाचगणी व तळदेव या दोन ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येते, तळदेव येथील कक्ष रिक्त असून पाचगणी येथील कक्षात 19 जण आहेत. या सर्वांचा क्वारंटाइन कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येणार असल्याचेही तहसीलदार सुषमा चौधरी यांनी सांगितले.