संदीप शिंदे
कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
सातारा – महाबळेश्वर ते धामणेर या रस्त्याच्या कामामध्ये येत्या चार दिवसात सुधारणा न झाल्यास रयतराज संघटना संबंधित रस्त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, शेतकरी यांना बरोबर घेऊन विभागवार रस्तारोको आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना रयतराज संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे व ग्रामस्थ, कार्यकर्ते व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चांगल्या पद्धतीचे रस्ते होण्याकरिता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी व राजकीय दलालांना हाताशी धरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे.
महाबळेश्वर ते धामणेर रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम करत असताना पूर्वीचे खड्डे मुजवून रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यासंदर्भातचे आदेश असतानासुद्धा खड्डे तसेच ठेवून नवीन कामास सुरुवात केली आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूला चारी खोदण्याचे व झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. चारी खोदत असताना पाण्याचा वापर न केल्यामुळे चारीमधील माती व झाडांची पावडर वाहनधारकांच्या डोळ्यात जाऊन त्यांना अनेक अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आंदोलकांनी आवाज उठवल्यावर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहेत. मात्र, येत्या चार दिवसात कामाचा दर्जा सुधारला नाही तर या रस्त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते व शेतकरी यांच्यावतीने विभागवार रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले. यावेळी कुमार भोईटे, जीवन जंगम, स्वप्निल लोखंडे, मयूर कांबळे, तानाजी किर्तन, प्रवीण अहिरे, सोमेश्वर क्षीरसागर, तन्वीर शेख, सुरज हिरेमनी, तात्या काकडे, तेजस देशमुख आदी उपस्थित होते.