देवस्थानचा प्रायोगिक तत्त्वावरचा निर्णय यशस्वी
महिनाभरात कोणाचाही विरोध, तक्रारी आल्या नाहीत – अभय टिळक
आळंदी (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थाने 27 डिसेंबर 2019 रोजी माउलींच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या भाविकांच्या महापूजा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यास सोमवारी (दि. 27) एक महिन्याच्या कालावधीत देवस्थाने घेतलेल्या निर्णयाचे आळंदीकरांसह भाविकांनी देखील स्वागतच केले होते. दरम्यान, हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर शुक्रवार (दि. 31) पर्यंत लागू राहणार असल्याचे त्यावेळी विश्वस्तांनी सांगितले होते. मात्र, या चल पादुकांवरील पूजा महिनाभरानंतरही सुरळीत सुरू असून कोणाचाही विरोध होत नसल्याने हा निर्णय कायमस्वरुपी लागू होण्याची शक्यता विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केली.
पहाटे सहा वाजल्यापासून दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत भाविकांच्या हस्ते होत असलेल्या पूजा या संजीवन समाधीवर घेण्यात येत होत्या. त्यामुळे श्रींना दिला जाणारा साडेबाराचा नैवेद्य वेळेत होत नव्हता. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समाधीला हात लावूनच परतावे लागत होते. त्यामुळे पहाटे सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत भाविकांची कुचंबणा होऊन दर्शनास अडथळे निर्माण होत होते.
यामुळे देवस्थाने माउलींच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या पूजा या बंद न करता किंवा कोणाचीही भावना न दुखावता त्याची जागा फक्त बदलली होती. म्हणजेच संजीवन समाधीऐवजी समाधी मागेच असणाऱ्या मुक्ताबाई मंडपात माउलींच्या चांदीच्या चल पादुकांवर घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
सुरुवातीला दोन-तीन दिवस पुजाऱ्यांनी या गोष्टी विरोध दर्शविला होता. मात्र, चल पादुकांवरील पूजा सुरूळीत झाल्याने पुजाऱ्यांचा विरोध मावळला व भाविकांनाही सुलभ दर्शन घेता येऊ लागल्याने देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांचेसह सर्व विश्वस्तांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सगळ्यांनी एक मुखाने स्वागत केले. तर तब्बल एक महिन्यानंतरही या चल पादुकांवर वरील पूजा देवा ब्राह्मणांच्या हस्ते सुरळीत सुरू आहे.