बारा वाजता मोर्चाला होणार सुरूवात
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूची यावरून देशभरात प्रचंड तांडव सुरू आहे. याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मनसेचा मोर्चा सुरू होण्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील राम मंदिरात आरती केली. यावेळी संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना काही गोष्टी टाळण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘सर्व महाराष्ट्र सैनिक व देशप्रेमी नागरिकांनी एवढ्या मोठ्या मोर्चात खबरदारी घेणे जरुरी आहे. काही जण या मोठ्या मोर्चात वेगळ्या उद्देशाने येतात, त्यांना तशी संधी अजिबात देऊ नये. त्यामुळे सहभागी होणारे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक यांनी कोणत्याही प्रकारची पिशवी, बॅग, बाटली, मौल्यवान वस्तू आणणे टाळावे. तसेच आपल्या मोबाईलचीही काळजी घ्यावी. मोर्चात कटाक्षाने प्लॅस्टिकचा वापर टाळून निसर्गाची काळजी घेणे जरूरी आहे,’ असे आवाहन पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.