चेन्नई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी व्यक्त केला.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची माहिती असतानाही निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. लाईव्ह लॉ या संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, येत्या 2 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर मतमोजणी थांबवू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. 30 एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
तसेच लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. संवैधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचं स्मरण करुन द्यावं लागतं हे दुर्देव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जिवंत असेल तरच तो त्याच्या लोकशाही अधिकारचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही कोर्टाने केला आहे.