भोपाळ: मध्यप्रदेश भाजपने ऐक्याचा दावा करत पक्षात गटबाजी असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आल्यास राज्य सरकार अवघ्या 24 तासांत पाडले जाऊ शकते, असा दावा बुधवारी केला होता.
मात्र, त्यानंतर भाजपलाच हादरा देणाऱ्या घटना मध्यप्रदेशात घडत आहेत. त्यामुळे भाजपला काहीसा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. त्यातून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी पक्षात दुही नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. सर्व काही नियंत्रणात असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, दोन आमदारांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दर्शवलेला पाठिंबा आणि कॉम्प्युटर बाबांचा दावा याबाबींची भाजपला गंभीर दखल घ्यावी लागल्याचे संकेत मिळत आहेत.