नवी दिल्ली : मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला असून यात ११ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना बसचा पत्रा चक्क कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.