आळंदी – आळंदीतील वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिद्धबेट केळगाव येथे संध्याकाळी एक वेळ मधुकरीची सेवा सुरु करण्यात आली आहे. सुमारे 100 विद्यार्थ्यांना ज्ञानाई मधुकरी सेवेचा लाभ मिळणार आहे. आज या सेवेला सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प. माणिक बाबा शास्त्री, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले, रामेश्वर महाराज मायकर, गजानन महाराज लाहुडकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर, प्रल्हाद भालेकर, मीरा भोसले, हमीद शेख यांसह आदी कीर्तनकार मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आहे. तसेच आळंदी हे वारकरी शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. राज्यभरातून हजारो मुले वारकरी शिक्षणासाठी येथे येतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळापासून मधुकरी (भोजन) मागून खाण्याची परंपरा आहे. त्यानुसार, विद्यार्थी आळंदी आणि शेजारील गावांमधून मधुकरी मागून आणतात आणि ती खावून वारकरी शिक्षण घेतात. आळंदीतही अनेक भाविक या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करतात. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धबेट येथे मधूकरी मागून शिक्षण घेऊन सध्या समाजात कीर्तन, प्रवचनाचे कार्य करत असलेल्या मंडळींनी या विद्यार्थ्यांसाठी मधुकरीची व्यवस्था केली आहे. तसेच दानशूर व्यक्तींनी आर्थिक तसेच धान्य स्वरूपात मदत करून विद्यार्थ्यांच्या मधुकरीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.