डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ तळेघर येथे सभा
भीमाशंकर – केंद्र व राज्य सरकार हे आदिवासी समाज संपविण्याचे षड्यंत्र करत आहे. आदिवासींचा हक्क हिसकाऊन दुसऱ्याला देण्याचे काम व जातीजातीमध्ये फूट पाडून भांडणे लावण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. शेतकरी, गरिबीच्या विरोधात सरकार आहे. पाच वर्षे अच्छे दिनाची स्वप्ने दाखवून देशाची व राज्याची दिशाभूल केली आहे. थापागप्पा मारणारे सरकारसह 15 वर्षे विकासकामांबाबत ठेंगा दाखवण्यऱ्या खासदारांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.
तळेघर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पिचड बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, मंगलदास बांदल, बी. बी. राक्षे, सुभाष मोरमारे, मारुती लोहकरे, गणपत कोकणे, रुपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, आदिवासी भागातील सरपंच, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शिक्षणमंत्री असताना आदिवासीसह मागासवर्गीय मुलांना उच्चशिक्षणाची फी शासनाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज मुले शिकली आहेत. आदिवासीच्या हक्कावर गदा आणण्याचे कारस्थान. तसेच 2000 च्या कायद्यात बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासीला केद्रांतून 10 टक्केही निधी मिळाला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांचे डी. बी. टीमुळे नुकसान झाले. शिक्षण हक्क कायदा केला, पण 5 वर्षांत एकही शिक्षक भरता आला नाही. मी 1 हजार शिक्षकांची पदे मंजूर केली ती यांनी बंद ठेवली. आदिवासीच्या सर्व योजना बंद केल्या असून वनवासी हिणवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुभाष मोरमारे म्हणाले की, आदिवासी भागातील जनता ही गेली 30 वर्षे वळसे पाटील यांच्या मागे असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्लाच आहे. मधुकर पिचड आदिवासींचे कैवारीच आहेत. त्यांच्या आवाहनाने आता जुन्नर, खेड, व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधव उमेदवार डॉ. कोल्हे यांना मतदान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त.
“एका शेतकऱ्याच्या मुलाला पाडण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी फौज उभी केली आहे. त्याला मोडीस काढून शिरूरची जनता सोमवारी (दि. 29) राष्ट्रवादीच्या पाठीशी राहुनच राज्याभिषेक करणार आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार