माधव विद्वांस
क्रिकेटपटू, उद्योजक माधवराव लक्ष्मणराव आपटे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाला. 12 दिवसांपूर्वीच त्यांचे 23 सप्टेंबर रोजी निधन झाले.त्यांचे शिक्षण चिल्ड्रन ऍकॅडमीमध्ये झाले. त्यानंतर ते स्कॉटिश प्रेसबेटेरियन विल्सन हायस्कूलमध्ये गेले, तेथेच त्यांना क्रिकेट खेळण्यास उत्तेजन दिले गेले. आपटे यांनी मुंबई विद्यापीठात बी. ए. ची पदवी घेतली तसेच एल्फिन्स्टन महाविद्यालयात ललित कलाची पदवी पूर्ण केली. ते साखर व कापड उद्योगात असलेल्या आपटे उद्योगसमूहाचे मालक लक्ष्मणराव आपटे यांचे चिरंजीव. सन 1933 मध्ये त्यांच्या आजोबांनी आपटे समूहाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात फलटणजवळ साखरवाडी येथे साखर कारखाना काढला. आता तो सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांकडे सुपूर्त केला आहे. त्यांनी आपटे ग्रुपच्या त्यांच्या कुटुंबातील कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम केले.
1948 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना विनू मांकडच्या प्रशिक्षणाखाली लेगस्पिन गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. वयाच्या 19 व्या वर्षी दौऱ्यावर आलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबविरुद्ध भारतीय विद्यापीठातर्फे प्रथम श्रेणीत प्रवेश केला. 1952 मध्ये विजय मर्चंट जखमी झाल्यामुळे सौराष्ट्र क्रिकेट संघाविरुद्ध प्रथम रणजी करंडक सामन्यात त्यांना संधी मिळाली. त्याच मोसमात पाकिस्तान संघाविरुद्ध त्यांनी राष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1953 मध्ये आपटे यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली, पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात त्यांनी पॉली उम्रीगरनंतर भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर (सन 1954) त्यांची पुन्हा भारतीय संघात निवड झाली नाही.
त्यांनी 1952-53च्या हंगामात 7 कसोटी सामने खेळले होते. जरी त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली होती तरी इतर प्रथमश्रेणी सामने खेळतच होते. 1967-68 मधील रणजी करंडकाचा मुंबई आणि मद्रास यांच्यातील अंतिम सामना हा प्रथम श्रेणीचा त्यांचा अखेरचा खेळ होता. 1989 मध्ये ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यानंतर त्यांनी क्लबच्या लिजेंड्स क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले. नंतर ते आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सामील झाले आणि वयाच्या 34व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्त झाले. डिसेंबर 1983 मध्ये आपटे यांची मुंबईचे शेरीफ म्हणून निवड झाली होती. 2011मध्ये त्यांनी 26व्या स्पोर्टस ट्रॉफीचे उद्घाटन केले होते. त्यांनी “एस् लक वेल हॅज इट’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांनी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तसेच आपटे समूहाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचा मुलगा वामन आपटे याने स्क्वॉशमध्ये आणि क्रिकेटमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांची मुलगी आंतरशालेय बॅडमिंटन चॅम्पियन होती.