माधव विद्वांस
साहित्यातील चोऱ्या सहज पकडणारे माधव मनोहर यांचे आज पुण्यस्मरण. वाङ्मयचौर्य पकडण्याच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना “साहित्यातले फौजदार’ म्हणत. त्यांचे पूर्ण नाव माधव मनोहर वैद्य होते. त्यांचा जन्म नाशिक येथे 20 मार्च, 1911 रोजी झाला. माधव मनोहर हे थोर समीक्षक, नाटककार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी पवन या टोपण नावानेही काही लेखन केले होते.
त्यांनी नाटके लिहिली तशीच अनुवादितही केली. त्यांनी एकांकिकाही लिहिल्या तसेच काही कादंबऱ्यांचे लेखन व अनुवादही केले. अनाथ विद्यार्थिगृहाच्या मुलांच्या मेळ्यासाठी पोवाडे आणि कविताही लिहिल्या. ते खूप अभ्यासूवृत्तीचे होते. त्यामुळे मराठी रंगभूमी व पाश्चात्य रंगभूमी यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. इंग्रजी वाङ्मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी नाटकांत व साहित्यातील उणिवांची जाणीव झाली. मराठी साहित्याचे वाचन करता करताच त्यांच्यातील समीक्षक जागा झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्मय मराठीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. एका मराठी दैनिकातील “चौपाटीवरून’ या सदरात व “सोबत’ मधील “पंचम’ या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. “नवशक्ती’, “रत्नाकर’, “रसरंग’ मधूनही त्यांचे समीक्षा लेख प्रकाशित होत. ते स्वतः लेखक व अनुवादक होते. पण त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे. त्यामुळे माधव मनोहर हे नाव समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.
माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे दुसऱ्यांच्या लेखनातील चुकांचे बरोबर चांगल्या गोष्टीचे त्यांनी कौतुकही केले. त्यांच्या समीक्षेत टीका आणि स्तुती दोनही असत. त्यांच्या समीक्षेवर कोणी आक्षेप घेतला तरी त्याचे लगेचच कारणमीमांसेसह त्याचे योग्य उत्तर देत असत. त्यांची समीक्षा इतकी सखोल सर्व पैलूंचा विचार करून केली असल्याने त्यांना फारसे स्पष्टीकरण देण्याची गरज भासली नाही. त्यामुळे अनेक लेखक आपली पुस्तके आपणहून त्यांचेकडे समीक्षेसाठी देत असत तसेच त्यांच्या प्रस्तावना त्यांच्याकडून घेत असत. माधव मनोहर यांची समीक्षा साहित्याला दिशा दाखवणारी होती. माधव मनोहर यांचे वाचन आणि अभ्यासाचा व्यासंग खूप मोठा होता. त्यामुळे साहित्यातील चौर्य त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग्रजी साहित्य मराठीत अनुवादित केले. नवशक्ती, रत्नाकर, सोबत, रसरंग यांसारख्या वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. अन्नदाता, आशा, एक आणि दोन, किल्ली, क्लिओपॅट्रा, पंचमवेध, मधुचंद्राची रात्र, मुलांची शाळा, स्मृतिरंग असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
1990 साली साताऱ्यामध्ये झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची राहणी अतिशय साधी होती. चाळीवजा पण आकाराने थोडे मोठे असलेल्या घरातच त्यांचे आयुष्य गेले. त्यातच त्यांची ग्रंथसंपदेने भरलेली कपाटे असायची. चित्रपट समीक्षक व लेखक गणेश मतकरी हे त्यांचे नातू आहेत. त्यांनी त्यांच्या घराचे सुंदर वर्णन केले आहे. माधव मनोहर यांच्या पत्नी मालती मनोहर या शिशुविहारमध्ये उपमुख्याध्यापिका होत्या. त्याही शिस्तप्रिय होत्या. वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, शिस्त त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. 1981 मध्ये माधव मनोहर यांना नाट्यसमीक्षा लेखनाबद्दल विष्णुदास भावे सुवर्णपदक मिळाले. रंगत संगत प्रतिष्ठान माधव मनोहर यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार देते. 16 मे 1994 रोजी त्यांचे निधन झाले. या समीक्षकास अभिवादन.