नगर – आषाढ महिन्यातील शुक्ल मंगळवार दि. 16 जुलै पौर्णिमा (गुरूपौर्णिमा) या दिवशी संपूर्ण भारतातून खंडग्रास चंद्रग्रहणाचा आविष्कार दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा.अरविंद रामकृष्ण गोरेगांवकर यांनी दिली. या खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध दि.16 जुलैला सुरू होतात. दि.17 जुलैला रात्री 1.30 वाजता प्रत्यक्ष ग्रहण स्पर्श होईल. रात्री 3.01 वाजता ग्रहण मध्य आणि पहाटे 4.30 वाजता ग्रहण मोक्ष होणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा पर्वकाळ तीन तासांच्या अवधीचा असेल.
हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ग्रहणाच्या तीन प्रहर आधी म्हणजे दुपारी 4 वाजता वेध सुरू होतात. वेधकाळात देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, स्नान, श्राध्दविधी करण्यास हरकत नाही.गुरूपौर्णिमेस मंगळवार दि. 16 जुलैला दुपारी 4 वाजेपर्यंत गुरूपुजन करावे. त्यानंतर गुरूवार दि. 18जुलैला गुरूपुजन करावे. बुधवार करिदिन आहे.
ग्रहणाविषयी कुठलीही भिती न बाळगता हा खगोलिय आविष्कार आहे, हे ध्यानी घ्यावे. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येत असल्याने पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्रबिंब काळवंडले जाते. आषाढ महिन्यात साधारणपणे ढगाळ वातावरण असते. नगर शहरात सध्या गेल्या 2-3 दिवसांपासून रात्री चंद्रबिंब स्पष्टपणे दिसते आहे. वातावरणात बदल न झाल्यास निरभ्र आकाशातील हे ग्रहण पहाण्याचा आनंद नगरकरांना घेता येईल. उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पहावयास हरकत नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने चंद्रबिंब पूर्णपणे काळे होणार नाही.
भारतीय वेळेनुसार अहमदनगर येथील ग्रहण वेळा अशा – मंगळवार दि. 16 जुलैला दुपारी 4 वाजल्यापासून वेध प्रारंभ, बुधवार दि.17 जुलैला रात्री 1.30 वाजता ग्रहण स्पर्श, मध्यरात्री 3.01 वाजता ग्रहण मध्य, पहाटे 4.30 वाजता ग्रहण मोक्ष. ग्रहण पर्व तीन तास आहे, असे प्रा. अरविंद गोरेगांवकर यांनी सांगितले.
जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान थेट प्रा.अरविंद गोरेगांवकर यांच्याकडून करून घेण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9890336277 यावर अवश्य संपर्क साधावा, असे आवाहन खगोलप्रेमी मिलिंद चवंडके यांनी केले आहे.