मुंबई – देशपातळीवर लम्पी या जनावरांना होणाऱ्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानसह महाराष्ट्रातही या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या गंभीर विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कार्यालयात तातडीची पत्रकार परिषद घेतली.
दूग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम करणारा हा आजार असून लसीकरण झाले नाही तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होईल, त्यामुळे या आजाराकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पशू संवर्धन मंत्री यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आजाराचा विम्यामध्ये अंतर्भाव नसल्याने शासनाने विमा कंपन्यांशी बोलून याचा अंतर्भाव करून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अंतर्भाव होईपर्यंत जनावरं दगावल्यास शासनाने शेतकऱ्याला मदत केली पाहीजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. याबाबत शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली असून त्यांनी केंद्रीय मंत्री व सचिवांशी संपर्क केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात ठराविक जिल्ह्यात गाईंना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराविषयी लोकांमध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणावर असल्याने ते दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. या आजाराविषयी काय खबरदारी घ्यावी याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रतिबंधक लसींची निर्मिती देशात दोन कंपन्याच करत आहेत. असे असल्यास परदेशातून लसी मागवा, मात्र शेतकऱ्याचे जनावर या आजारातून बाहेर पडले पाहीजे. जनावरे दगावली तर त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यवसायावर होईल, असे अजित पवार म्हणाले. आगामी काळात साखर कारखाने सुरु होत असून कारखान्यात ऊस वाहून आणण्यासाठी बैलांची गरज लागते. जर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा मोठा फटका बसू शकेल, असे ते म्हणाले.