पुणे – अधिक प्रमाणात झालेली लागवड…ढगाळ वातावरण, वाढलेल्या उत्पादनामुळे मार्केट यार्डात टोमॅटोची आवक वाढली आहे. मागील रविवारच्या (दि.13) तुलनेत आज (दि. 20) तब्बल दुप्पट आवक झाली. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने टोमॅटोच्या भावात निम्म्याने घट झाली आहे.
घाऊक बाजारात टोमॅटोस किलोस दर्जानुसार 6 ते 10 रुपये भाव मिळाला. जो गेल्या आठवड्यात 15 ते 20 रुपये होता. टोमॅटोस मिळालेला हा हंगामातील नीचांकी भाव असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे संचालक सचिन पायगुडे यांनी सांगितले.
येथील तरकारी विभागात गेल्या रविवारी (दि. 13) टोमेटोची 6 हजार पेटी आवक झाली. ती आज 12 हजार पेटी झाली. याविषयी चांगला झालेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. परिणामी बाजारात माल जास्त दाखल होत आहे. घाऊक बाजारात जरी भाव घसरले, असले तरीही किरकोळ बाजारात भाव थोडेसे चढेच आहेत. किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री होत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.
नारायणपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांत यावर्षी नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड झाली आहे. त्यामुळे बाजारात जास्त आवक होत आहे. मात्र, करोना संसर्गामुळे अद्याप पूर्ण क्षमतेने हॉटेल, खानावळी सुरू झालेल्या नाहीत. कंपन्यामधील कॅंटीनमधुनही नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे. त्यामुळे टोमॅटोला कमी भाव मिळत आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे.
– सचिन पायगुडे, संचालक, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन, पुणे.