सोन्याच्या मागणीमध्ये तब्बल 9 टक्के घट
पुणे – सरलेल्या वर्षात जागतिक व्यापार युद्ध आणि आर्थिक मंदीमुळे सोन्याच्या किमतीत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली. भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे या वर्षात भारतीयांनी सोन्याची खरेदी कमी केली असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेने जारी केलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये सोन्याची आयात 9 टक्क्यांनी कमी होऊन 690 टन एवढी मर्यादित झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर जास्त पातळीवर आहेत त्याचबरोबर या दरांमध्ये साडेबारा टक्के आयात शुल्क आणि चार टक्के जीएसटीचा समावेश होते. त्यामुळे भारतीयांना सोने अधिकच महाग पडत असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे असे स्थानिक ज्वेलर्स यांनी सांगितले.
2018 च्या तुलनेमध्ये 2019 संपताना सोन्याच्या दरांमध्ये 24 टक्क्यांची वाढ होऊन सोन्याचा दर 39 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेला होता. मात्र आगामी वर्षाबाबत आम्ही आशावादी असल्याचे सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले.
भारतीय सोन्याची विश्वासार्हता वाढावी याकरीता सरकारने चालू वर्षांमध्ये सर्व ज्वेलर्सना हॉलमार्कची तयारी करण्यास सांगितले आहे. पुढील वर्षापासून भारतातील सर्व दागिने हॉलमार्कचे असतील. त्यामुळे देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीलाही आधार मिळू शकतो. भारतात दागिने क्षेत्रात जास्त स्पर्धा असल्यामुळे आणि सोन्याचे दर जास्त असल्यामुळे दागिने उत्पादकांना अतिशय कमी नफ्यावर काम करावे लागत. त्यातच सरकार आवश्यकतेपेक्षा जास्त कर या क्षेत्रावर लावत आहे. तो कमी करण्याची गरज असल्याचे ज्वेलर्सना वाटते. सरलेल्या वर्षात गुंतवणूक म्हणून घेतल्या जात असलेल्या सोन्याच्या मागणीवर जास्त परिणाम झाला आहे.आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढू नये यासाठी काही तरतुदी केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे पण तसे होताना दिसत नाही.हॉलमार्क बाबत सुद्धा अधिक जागरुकतेची गरज आहे.
सोन्याच्या तस्करीत वाढ
भारतात सोन्यावर जास्त कर आहे त्यामुळे जागतिक दरापेक्षा भारतातील सोन्याचे दर जवळजवळ 15 टक्क्यांनी जास्त आहेत. अशावेळी तस्करी वाढण्याची शक्यता असते. सरलेल्या वर्षांमध्ये भारतात जवळ-जवळ 120 टन सोने तस्करीच्या मार्गातून आल्याचे सुवर्ण परिषदेला वाटते.