सांगली – लग्नानंतर सहाव्या दिवशीच नववधूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातील एकुंडी गावात उघडकीस आली आहे. तसेच तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही आपापल्या घरी वीष पिऊन आत्महत्या केली. आश्विनी गजानन माळी (वय 22), लक्ष्मण संभाजी शिंदे (वय 21) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आश्विनी माळी ही मूळची सरगरे येथील असून ती सध्या एकुंडी येथे राहण्यास होती. एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे यांच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे एक जूनला तिचा विवाह झाला होता. ती मिरज येथून एकुंडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती.
सोमवारी आश्विनी आणि लक्ष्मण या दोघांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विष प्राशन केल्याचे समजताच कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे एकुंडी गावावर शोककळी पसरली आहे.