हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि गुणी कलाकार सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यावर जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या; पण याच कालावधीमध्ये झालेल्या इतर आत्महत्यांचा विचार करता तो विषय अधिक गंभीर मानावा लागेल. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या थेटपणे करोना विषाणूच्या महासंकटाशी संबंधित नव्हती. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या महासंकटाने जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे ज्या आत्महत्या होत आहेत त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे आकडे प्रसिद्ध झाले. त्याप्रमाणे त्याच्याकडे 60 कोटी पेक्षा जास्त रुपयांची संपत्ती होती. त्यामुळे त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असे म्हणता येत नाही; पण याच कालावधीमध्ये झालेल्या इतर आत्महत्यांवर नजर टाकली तर बहुतेकांनी आगामी काळातील आर्थिक विवंचना लक्षात घेऊन जीवन संपवले आहे. रविवारी मुंबईतील नालासोपारा येथे एका पित्याने आपल्या तीन मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. त्यामागेही आर्थिक कारण असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. गेल्या आठवड्यात पुणे येथेही एकाच दिवसात आत्महत्येच्या पाच घटना घडल्या होत्या.
सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जाचे हप्ते थकल्यामुळे शेजारची महिला टीका करत असल्याच्या कारणावरून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. देशात किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यात दररोज कोठे ना कोठे तरी तरुण मुले भविष्य अंधकारमय असल्याच्या भीतीतून जीवन संपत आहेत. याच कालावधीमध्ये नेहमीप्रमाणे राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याही सुरूच आहेत. बेरोजगारीला कंटाळून युवकाने आत्महत्या करणे किंवा नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे ही मालिका देशात आणि महाराष्ट्रात सुरू असली तरी सध्याच्या महासंकटाच्या कालावधीमध्ये या आत्महत्या विशेष उठून दिसत आहेत हेही नाकारून चालणार नाही.
सध्या सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्यामुळे उत्पादन आणि सेवा या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अनेकांचे पगार कमी झाले आहेत. छोटे स्वयंरोजगार करणाऱ्यांचा आर्थिक गाडा ठप्प झाला आहे. बहुतेक सर्वांचीच परिस्थिती समान असली तरी त्यापैकी काहीजण या परिस्थितीशी सामना करू शकत नसतील तर केवळ लाखो कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करून काहीही साध्य होणार नाही. त्यांची मानसिकता बळकट करण्यासाठी सरकार काही करणार आहे की नाही हे जास्त महत्त्वाचे आहे. “या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे शब्द केवळ गाण्यात न राहता ते प्रत्यक्षात यावेत याकरता सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. सुदैवाने संकटाच्या कालावधीमध्ये सर्व कुटुंबीय एकत्र राहत आहेत. त्यांची सुखदुःखे समजून घेणे आणि त्यावर मार्ग काढणे त्यामुळे सहज शक्य होणार आहे. हे काम कौटुंबिक पातळीवरच प्रभावीपणे होणार आहे. त्याही व्यक्तीच्या आयुष्यात मित्र, कुटुंबीय, व्यावसायिक किंवा कार्यालयीन सहकारी असे अनेक लोक असतात. यापैकी प्रत्येकानेच आपल्या जवळच्या लोकांचे काही बिनसले का, त्यांचे मानसिक संतुलन ढळले का, याचा शोध घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम करावे.
ठप्प झालेले आर्थिक व्यवहार, दैनंदिन व्यवहारांना लागलेला ब्रेक यामुळे सर्वांचेच वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याने नैराश्य येणे साहजिकच आहे. या नैराश्यातूनच मार्ग काढून पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरच आहे. आत्महत्या करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत तर उलट नवीन प्रश्न अधिक तीव्रतेने निर्माण होतात, हेच प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे. प्रत्येकाचे दुःख आणि विवंचना वेगळी असली तरी त्याला ठामपणे सामोरे जाणे अधिक महत्त्वाचे आहे. कुटुंबातील संवाद अधिक वाढणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या कालावधीमध्ये घरात बसलेल्या लोकांना दूरचित्रवाणीचे माध्यम हे सर्वात मोठे मनोरंजनाचे साधन असल्याने त्याचा वापर करूनही लोकांची मानसिकता अधिक सकारात्मक करण्याचा विचार व्हायला हवा. विविध वाहिन्यांवर जुनेच कार्यक्रम दाखवले जात आहेत, त्यापेक्षाही अधिक सकारात्मक ऊर्जा वाढवणारे कार्यक्रम दाखवण्यात आले तर मानसिकताही बदलू शकते.
वृत्तवाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये असे सकारात्मक संवादाचे कार्यक्रम अधिक प्रमाणात प्रसारित करण्याची गरज आहे. सतत करोनाच्या बातम्या दाखवून आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे हे दाखवून नकारात्मक मानसिकता करण्यापेक्षा काही तरी सकारात्मक दाखवून जगण्यावर प्रेम करण्यास शिकवले पाहिजे. महासंकटाच्या कालावधीमध्ये सर्वांनाच या संकटाचा कमी-अधिक प्रमाणात फटका बसला असल्याने केवळ आपणच जास्त संकटात आहोत, असा समज कोणीही करून घेऊ नये. सरकारसह सर्वच यंत्रणांना याची जाणीव असल्याने करोनाचा प्रभाव कमी झाला की पुनर्वसनाला गतीने प्रारंभ निश्चितपणे होऊ शकतो.
सध्या सहनशक्ती दाखवून स्वस्थ बसणे अधिक महत्त्वाचे आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे आत्महत्येसारखे प्रकार घडू नयेत म्हणून सर्वात जास्त जबाबदारी ही कुटुंबाचीच आहे. एकमेकांना समजून घेऊन सकारात्मक संवाद साधून संकटाशी ठामपणे मुकाबला करण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. ज्यांचे करिअर अद्याप सुरूही झालेले नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येणार नाही यासाठी प्रयत्न करणे हे मोठे आव्हान आहे. शैक्षणिक शेत्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत घोळ सुरूच असल्याने आपल्या भविष्याचे काय, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यांना दिलासा देण्याचे काम प्रामुख्याने करावे लागणार आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक संकटांचा सामना करण्याचे नागरिकांना शिकवले आहे.
देशात “अनलॉक’ टप्पा सुरू झाला आहे. आर्थिक गाडा हळूहळू सुरू झाला आहे त्यामुळे आपली मानसिकता कणखर राखण्याची गरज आहे. नालासोपारा येथील बातमीमुळे मन काही काळ विचलित होत असले तरी या बातम्या मागे टाकून पुढे बघण्याची गरज आहे. कुटुंबातील आणि समाजातील सर्वांनीच एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांची सुखदुःखे समजून घेऊन सकारात्मक संदेश प्रसारित केला तर आपोआपच या जगण्यावर शतदा प्रेम करण्याचा विश्वास निर्माण होईल.