नागपूर – विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमव्यक्त केलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंग आहे. असा महत्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खटल्या दरम्यान दिला आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणी नागपूर खंडपीठात घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. अकोला जिल्हयात 2011 मध्ये घडलेल्या घटनेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी झाली. 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करुन तिला धमक्या दिल्याचा आरोप एका 54 वर्षीय पुरुषावर होता.
आरोपीने पीडित महिलेला एक चिठ्ठी दिली होती. ती घेण्यास तिने नकार दिला होता. त्यानंतर आरोपीने ती चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं तो तिला म्हणाला. कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर पीडित महिलेने अकोल्यातील सिव्हील लाइन्स पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
दरम्यान न्यायालयाने आज या निकालाची सुनावणी केली यामध्ये या प्रकरणात एखाद्या 45 वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.