सांगली – लव्ह जिहादचा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावर जातीय तेढ निर्माण केले जात असून, समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी भाजपवर केली.
कासेगावमध्ये येथील क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, या मुद्द्यावरून निर्माण करण्यात येणारे तेढ अखंड समाजासाठी घातक आहेत. सद्यस्थितीत समाजात जे सुरु आहे, त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र त्याविरोधात उठाव होताना दिसत नाही.
प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करायला हवा. दुसऱ्याच्या धर्माबद्दल आकस बाळगा असे कोणताच धर्म सांगत किंवा शिकवतही नाही. स्वतःच्या धर्माची प्रार्थना स्वतःच्या घरात करा किंवा मंदिरात करा. पण घरातून बाहेर पडताना एक माणूस म्हणून बाहेर पडा, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
“त्या’ घटनेला तीन वर्षे झाली –
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे झालेल्या शपथविधीवर पवार म्हणाले, सारखे-सारखे ते उगाळू नका. त्या घटनेला आता तीन वर्षे झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या घटनेवर पडदा टाकला आहे. पुन्हा तेच-तेच विचारण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी व सद्यस्थितीत जे काही सुरु आहे त्यावर बोला. या विषयांवार समाजमाध्यमावर जनजागृती करायला हवी, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.