नवी दिल्ली – आमचे सरकार 140 कोटी लोकांसाठी काम करत आहे. आम्ही देशातील लोकांच्या उदरनिर्वाहासाठी काम करत आहोत. तरीही विरोधकांच्या निशाण्यावर पंतप्रधानच सातत्याने असतात. मात्र एक माणूस किती जणांच्या विरोधाला न जुमानता सतत कार्यरत आहे, हे संपूर्ण देश बघतो आहे. तुम्ही कितीही चिखलफेक करा; कमळ तर चिखलातच उगवते, हे ध्यानात ठेवा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांवर तोंडसुख घेतले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 31 जानेवारी रोजी केलेल्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत भाषण केले. मोदींच्या सुमारे दीड तासाच्या भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवला. ज्यावर मोदीही संतापलेले दिसले. मोदींनी भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यावरून विरोधकांना आरसा दाखवला. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत 27 लाख कोटी रुपये डायरेक्ट बॅंक ट्रान्सफरद्वारे (डीबीटी) थेट संबंधितांच्या खात्यात गेले आहेत. यामुळे 2 लाख कोटी रुपयांहून अधिक जे कोणत्याही “इको-सिस्टीम’च्या हातात जाऊ शकले असते, ते वाचले. आता ज्यांना हे पैसे मिळू शकले नाहीत, त्यांची ओरड होणे स्वाभाविक आहे.
पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे राजकारण, आर्थिक धोरण आणि सामाजिक धोरण केवळ व्होट बॅंकेच्या जोरावर चालायचे, परंतु आम्हाला रस्त्यावरील फेरीवाल्यांची काळजी वाटते. पीएम स्वानिधी आणि पीएम विकास योजनेच्या माध्यमातून आम्ही समाजातील एका मोठ्या वर्गाची क्षमता वाढवण्याचे काम केले आहे. केरळमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार निवडून आले, जे पंडित नेहरूंना पसंत नव्हते. काही दिवसांतच निवडून आलेले सरकार पाडले गेले. तामिळनाडूमध्येही एमजीआर आणि करुणानिधींसारख्या दिग्गजांची अनेक सरकारे कॉंग्रेसने पाडली. एनटीआरचा आत्मा पाहत असेल, तुम्ही कुठे उभे आहात. कॉंग्रेसने एनटीआर सरकारही पाडले होते. राजभवनांचे कॉंग्रेस कार्यालयात रूपांतर करण्यात आले होते, हे विसरता येणार नाही.
पंतप्रधान म्हणाले, जे आज विरोधी पक्षात बसले आहेत, त्यांनी राज्यांचे अधिकार नष्ट केले. मला सांगा, कलम 356 चा गैरवापर करणारे कोण होते? एका पंतप्रधानाने 50 पेक्षा जास्त वेळा कलम 356 वापरले, ती व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी होय. आम्ही बेटी बचाओ अभियान सुरू केले. मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या वाढत आहे याचा मला आनंद आहे. शौचालयाअभावी मुलगी शाळेत जाणे आणि शाळा सोडणे याची आम्हाला चिंता वाटत होती. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवावीत.